अमळनेर (पंकज शेटे):-महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांना बारामती येथील अंत्ययात्रेच्या दिवशी अमळनेर येथे सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात आली.शेकडो कार्यकर्त्यांनी डिजिटल स्क्रीनद्वारे अंत्ययात्रेत दर्शन घेऊन आपल्या लाडक्या नेत्यास अखेरचा निरोप दिला.यावेळी अत्यंत भावनाशील वातावरण निर्माण झाले होते.
शेकडो कार्यकर्त्यांनी डिजिटल स्क्रीनद्वारे घेतले अंत्ययात्रेचे दर्शन
बारामती येथील विमान दुर्घटनेनंतर अजितदादा पवार यांची अंत्ययात्रा काल दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता बारामती येथे काढण्यात आली.अमळनेर मतदारसंघातील कार्यकर्त्यांना अखेरचे दर्शन व निरोप देता यावा म्हणून आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या डिजिटल स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती.यावेळी माजी नगराध्यक्षा सौ जयश्री अनिल पाटील यांच्यासह शेकडो महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटिक, इम्रान खाटीक, पत्रकार पांडुरग पाटील, शेखर पाटील, विजय शेखनाथ पाटील, भाजपाचे हिरालाल पाटील, शरद सोनवणे, विनोद कदम, भाऊसाहेब पाटील
माजी तालुकाध्यक्ष शिवाजीराव पाटील यासह अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करताना अजित दादांसोबतच्या आठवणीना उजाळा देत आदरांजली अर्पण केली. यावेळी अनेकांचे डोळे पाणावले होते.अखेरचा अग्निडाग देईपर्यंत सारेच जण स्क्रीन समोर स्तब्ध होते.शेवटी अग्नीडाग दिल्यानंतर “अजित दादा अमर रहे”च्या घोषणा देण्यात आल्या. सर्वानी अजितदादा यांच्या प्रतिमेसमोर पुष्प अर्पण केल्यानंतर सामूहिक शांतिमंत्र म्हणून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी जि.प, पं.स, बाजार समितीचे आजी माजी पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, आजी माजी सरपंच, विकासो चेअरमन, राष्ट्रवादी तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान आमदार अनिल पाटील हे अमळनेर येथे आल्यानंतर सर्वपक्षीय शोकसभा अमळनेरात होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
आमचा बाप गेला,अनिल पाटील
घटनेनंतर प्रचंड हादरलेले असलेले आमदार अनिल पाटील हे बारामती येथेच होते,कुणासोबतही बोलण्याच्या मनस्थितीत ते नव्हते.मात्र अंत्ययात्रेनंतर मीडिया समोर त्यांनी येऊन अश्रू ढाळतच आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.”आमचा बाप गेला,आम्ही आता कुणाकडे पाहायचं,कुणाकडे व्यथा मांडायच्या,माझ्या मतदारसंघात विकासाची एक एक वीट अजित दादानीच रचलेली,दर मंगळवारी आम्हा आमदारांना ते बोलावून समस्या जाणून घ्यायचेत,आता कुणाकडे आम्ही त्या मांडायच्या, स्वप्नातही वाटले नव्हते की असे काही घडेल,पण नियतीने घात केला या शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या.


